सर्व मृतक नक्षल्यांनी ओळख पटविण्यात पोलिसांना यश,
गडचिरोली;
जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी पोलीस स्टेशन हद्दीतील जंगल परिसरात झालेल्या पोलीस व नक्षल चकमकीत ठार नक्षल्यांमध्ये सात पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. पोलीस विभागाकडून सर्व मृतक नक्षल्याची ओळख पटविण्यात आली असून मृतक नक्षल्यांवर महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन्ही राज्य सरकारांनी दोन कोटींहून अधिक रुपये रक्कमेचे बक्षीस जाहीर होते.
गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात अधीक्षक निलोत्पल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार (ता. १७ जुलै) बुधवारी जारावंडी पोलीस हद्दीतील जंगल परिसरात १२ ते १५ नक्षलवादी हे नक्षल्यांच्या वार्षिक सप्ताह निमित्त मोठा घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्र आले होते. यासंदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशावरून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले होते. त्यानुसार सी ६० या विशेष नक्षलविरोधी पथकाचे २०० जवान मुसळधार पावसात वांडोली जंगल परिसरात मोहीमेवर असताना दबा धरून असलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलीस जवानांनी केलेल्या कारवाईत १२ नक्षलवादी ठार झाले, काही नक्षलवादी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. सदरच्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील, सी ६० पोलीस कमांडो शंकर पोटावी व विवेक शिंगोळे हे तिघे जखमी झाले आहेत.
चकमकीत ठार झालेल्या सर्व नक्षल्यांची ओळख पटविण्यात आली असून, मृतांमध्ये चातगाव- कसनसूर संयुक्त दलम प्रमुख तसेच विभागीय समिती सदस्य योगेश दावसिंग तुलावी ऊर्फ नरेंद्र ऊर्फ निरींगसाय (वय ३६) रा. भिमनखोजी ता. कोरची, कोरची-टिपागड संयुक्त दलमप्रमुख तसेच विभागीय समिती सदस्य विशाल कुल्ले आत्राम ऊर्फ लक्ष्मण ऊर्फ सरदु (४३) रा. गोरगुट्टा ता. एटापल्ली, टिपागड दलम विभागीय समिती सदस्य प्रमोद लालसाय कचलामी ऊर्फ दलपट (३१) रा. वडगाव ता. कोरची, या तीन मोठ्या नक्षल नेत्यांसह महारु धोबी गावडे (३१) रा.नैनेर ता.अहेरी, अनिल देवसाय दर्रो ऊर्फ देवा ऊर्फ देवारी (२८) रा. मुरकुटी ता. कोरची, सरिता जारा परसा ऊर्फ मिना ऊर्फ रामे (३७) रा. गळदापल्ली, ता. एटापल्ली, रज्जो मंगलसिंग गावडे ऊर्फ समिता ऊर्फ सिरोंती ( ३५) रा. बोटेझरी ता. कोरची, सिता हवके (२७) रा. मोरडपार ता.भामरागड, रोजा रा. बस्तर एरीया छत्तीसगड, सागर रा. बस्तर एरीया छत्तीसगड, चंदा रा. माड छत्तीसगड, विज्जू रा. बस्तर एरीया छत्तीसगड यांचा समावेश आहे. या सर्वांवर ३०० हून अधिक गंभीर गुन्हे छत्तीसगड व महाराष्ट्र पोलिसांत दाखल असून या सर्वांना पकडून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे ८६ लाख तर छत्तीसगड सरकारचे १ कोटींहून अधिक बक्षीस जाहीर केले होते. सन २०२१ साली झालेल्या कसनासुर, बोरिया व मार्दीनटोला या पोलीस व नक्षल्यामधील चकमकीनंतर गडचिरोली पोलिसांना मिळालेले हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. या चकमकीनंतर कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर दलम पूर्णपणे संपले असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे.
चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये १६ लाख रुपयांचे बक्षीस असलेला चातगाव-कसनसूर संयुक्त दलम प्रमुख तसेच विभागीय समिती सदस्य योगेश दावसिंग तुलावी ऊर्फ नरेंद्र ऊर्फ निरींगसाय याचा समावेश असून त्याच्यावर हत्या, चकमक, जाळपोळ प्रकरणात एकूण ६७ गुन्हे दाखल होते. पोलीसांच्या रेकॉर्डवर त्याची कुख्यात नक्षलवादी अशी नोंद आहे. योगेशचा अनेक हिंसक कारवाया व चकमकीत सहभाग होता. त्याच्या मृत्यूने उत्तर गडचिरोलीतील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याचे मानल्या जात आहे. गेल्या तीन वर्षांत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईत ८० नक्षलवादी ठार झाले. तर १०२ जणांना अटक करण्यात आली. तसेच २९ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान, अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अभियान यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक प्रशासन कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश प्रामुख्याने उपस्थित होते.