आलापल्ली- नागेपल्ली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) चे नामकरणाची राज्य शासनाची मंजुरी
अहेरी; (गडचिरोली)
महाराष्ट्र राज्य शासनाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यामार्फत शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत शिल्प कारागीर प्रशिक्षण योजने अंतर्गत युवकांना या संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. अशा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणे असा आहे. राज्य शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) नावात बदल करण्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील अनेक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) संस्थांचे नामकरण करण्यात आले त्यात समाजसुधारक, सामाजिक क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्वाची नावे देण्यात आली आहे.
त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय) ला अहेरी इस्टेटचे दिवंगत राजे “राजे विश्वेश्वरराव आत्राम” यांचे नाव देवून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
अहेरी इस्टेटचे दिवंगत राजे, माजी खासदार, शिक्षण महर्षी, राजे विश्वेश्वरराव महाराज आत्राम यांनी आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील मागासलेला क्षेत्र विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपले आयुष्य खर्ची पाडले. धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना करत संपूर्ण जिल्ह्यात शिक्षणाच जाळ पसरवलं आणि आपला समाज शिक्षित होऊन विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं. त्यांचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान आहे. आज महाराष्ट्र राज्याने त्यांच्या कार्याची दखल घेत आलापल्ली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाला नाव देऊन शासनाने राजे विश्वेश्वराराव महाराज यांच्या कार्याचा सम्मान केल्याने आणि गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढविल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करून राज्य शासनाचे आभार मानल्या जात आहे.!