News34 chandrapur
चंद्रपूर :- पोंभुर्णा तालुक्यात आदिवासी बांधवांनी कालपासून सुरू केलेल्या धरणे आंदोलन ला वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भुषण फुसे यांनी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
आदिवासी बहुजन समाजाच्या विविध मागण्या घेऊन पोंभुर्णा येथील सावित्रीबाई फुले चौक येथे रस्ता रोको व धरणे आंदोलन कालपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भुषण फुसे हे आंदोलन स्थळी गेले व त्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
50 टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, 50 वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, सुरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी, इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला वाढविण्यात यावा अशा अनेक मागण्या घेऊन आदिवासींचे हे आंदोलन सुरू केलं आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर आदिवासी ठाम आहेत. या आंदोलनामुळे पोंभूर्णा-मूल आणि गोंडपिंपरी-मूल अशी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
याबाबत बोलताना भुषण फुसे यांनी म्हटले की सरकार हिटलरशाही पध्दतीने वागत आहे, आणि त्याच धर्तीवर राज्य शासनाच्या माध्यमातून आदिवासींवर अन्याय होत असुन तो आज पेटुन उठला आहे.
अशीच एकी असली तर सरकारला आपल्या मागण्या मान्य कराव्याच लागेल. पुढे बोलताना ते म्हणाले की पेसा कायदा लागू झालाच पाहिजे तसेच सुरजागड प्रकल्पातील ओव्हरलोड वाहतूक यामुळे पोंभुर्णा तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत, अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे ही वाहतूक बंद करण्यात यावी या आंदोलनाला मागण्या मान्य होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी साथ देणार असल्याचे मत व्यक्त केले.
पुढे फुसे म्हणाले की, केंद्र सरकार आदिवासी समाजाला खूप मान-सन्मान देतो असे दाखवण्यासाठी आदिवासी महिला द्रौपदी मुर्मु यांना देशाचे राष्ट्रपती बनवले यामुळे आम्ही आदिवासी समाजाला विशेष महत्त्व देतो असे दर्शविले परंतु काल-परवाच जम्मू काश्मीर चे माजी राज्यपाल यांनी स्फोटक विधान केले की द्रौपदी मुर्मु कोणत्या कार्यक्रमात सहभागी होणार, त्यांना कोण- कोण भेटणार याचा सर्व निर्णय प्रधानमंत्री ठरवतात यावरून ठरवा की अधिकार किती ? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
या देशात वन्य प्राण्यांची लोकसंख्या मोजली जाते, परंतु 55% ओबीसी असलेली मानवी लोकसंख्या मोजली जात नाही ही शोकांतिका आहे त्यामुळे ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे अशी मागणी ही यावेळी त्यांनी केली.
यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक तथा सामाजिक कार्यकर्ते जगण येलके, सामाजिक कार्यकर्ते विलास मोगरकर, वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते अविनाश वाळके, वंचित बहुजन आघाडी चे जेष्ठ नेते श्यामकांत गेडाम, नगरसेवक अतुल वाकडे, सुमित मानकर,अजय उराडे व असंख्य वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.