News34 chandrapur
चंद्रपूर : कर्नाटक राज्यात भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून सरकार स्थापन केले होते. या काळात त्यांनी विकासाचे राजकारण न करता केवळ भ्रष्टाचार करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळेच कर्नाटक राज्यातील भाजप सरकारला ४० टक्क्यांचे सरकार अशी ओळख मिळाली होती. या सरकारच्या कार्यकाळात कर्नाटक राज्यातील जनता कंटाळली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजप नेत्यांना विकासावर मते मागणे शक्य झाले नाही. शेवटी त्यांना जय बजरंग बलीचा नारा द्यावा लागला. परंतु, भाजप नेत्यांचा ढोंगीपणा ओळखून तेथील जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले. या निवडणुकीत भाजपची नली तोडत बजरंग बली काँग्रेसला पावले असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिली. Karnatak election results
कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. यात कर्नाटक राज्यातील जनतेने भ्रष्ट भाजप सरकारला नाकारत काँग्रेस पक्षावर विश्वास दर्शवित स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा (शहर-ग्रामीण) काँग्रेसच्या वतीने येथील कस्तुरबा चौकात फटाके फोडून, मिठाई, लाडू वाटप करून जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी बोलत होते.
श्री. तिवारी पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून प्रत्येक निवडणुकीत धर्माचे राजकारण केले जाते. परंतु, आता मतदार शहाणा झाला आहे. जनतेला धर्माचे नको, तर विकासाचे राजकारण हवे आहे, हे कर्नाटक राज्यातील जनतेने या निकालातून दाखवून दिले आहे. कर्नाटक राज्यातून सुरू झालेला काँग्रेस पक्षाचा विजयरथ आता येत्या सर्वच निवडणुकीतसुद्धा पुढे जाताना दिसणार आहे. Congress party chandrapur
बजरंग बलीची वेशभुषा धारण केलेली व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोनियाजी गांधी जिंदाबाद, राहुलजी गांधी जिंदाबाद, प्रियंका गांधी जिंदाबाद, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्यानंतर फटाके फोडून नागरिकांना मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर कारागृह परिसरातील हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक विभाग, अनुसूचित जाती विभाग यांच्यासह सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.