News34 chandrapur
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच सौहार्दाचे वातावरण राहीले आहे. जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात प्रत्येक पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी या मतभेदांना व्यक्तीगत पातळीवर येवू न देण्याची काळजी सर्वच पक्षातील संस्कारक्षम दिग्गज नेत्यांनी नेहमीच घेतली आहे.
हल्ली जिल्ह्यातील राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव होत आहे. चंद्रपूरच्या राजकीय संस्कृतीला हे आव्हान असुन ते जनतेच्या हिताचे नाही. त्यामुळे सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी चिंतन करण्याची गरज आहे. वैयक्तिक स्तरावर सुडाचे राजकारण सुरु झाल्याचे संकेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचेवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतून मिळत असून अशा प्रवृत्तीला संपविणे गरजेचे आहे. जिल्हा पोलिसांनी रावत गोळीबारातील आरोपींना केलेली अटक कौतुकास्पद व गुन्हेगारांच्या नाड्या आवळणारी असल्याचे पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
अशाप्रकारचे जीवघेणे, भ्याड हल्ले ही चंद्रपूर जिल्ह्याची संस्कृती नाही. या जिल्ह्यात विवेक शाबूत ठेवून राजकारण करणारे नेते होते व आहेत त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय नेत्यावर झालेली गोळीबाराची घटना जिल्ह्याचे सौहार्दाचे राजकारण बिघडविणारे व कलंकित करणारे असल्याचेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे. पोलिसांना आरोपींचा छडा लावण्यात यश मिळाले असल्याने या प्रकरणाच्या खोलात जावून सखोल चौकशी करावी, हल्ल्यामागील मुळ कारण शोधतांनाच या आरोपींच्या डोक्यावर कोणाचा हात किंवा कोणती शक्ती आहे याचा पर्दाफाश होईल या दृष्टीने तपास होण्याची गरज अहीर यांनी प्रतिपादीत केली आहे.
आरोपींकडे बंदुक कुठून आली ती कुणाची आहे याचाही सखोल तपास व्हावा अशी सुचना हंसराज अहीर यांनी पोलिस प्रशासनास केली आहे. आरोपी गोळीबार प्रकरणात जे कारण देत आहेत ते तार्कीकदृष्ट्या पटणारे नसल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेत भविष्यात आणखी अशा अमानुष घटना घडणार नाहीत व गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढणार नाही या भुमिकेतून पोलिसांनी कर्तव्य निभवावे अशा प्रवृत्तींना ठेचून काढावे असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.