या धक्कादायक घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा पोलीस अलर्ट

पोलिसांचा बंदोबस्त वाढणार

News34

चंद्रपूर/नागभीड – चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात घडलेल्या 2 दुर्दैवी घटना समाजमन सुन्न करणाऱ्या होत्या.
गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथे 3 चिमुकले वर्धा नदीत मासेमारी करण्यासाठी गेले मात्र नागरिकांना त्यांचा मृतदेहचं मिळाला. Chandrapur police
8 जुलै च्या या घटनेनंतर चंद्रपूर जिल्ह्यात 16 जुलै ला पुन्हा एक दुर्दैवी घटना घडली या घटनेत 4 युवकांचा मृत्यू झाला.

 

16 जुलै रोजी शेगाव येथील 8 युवक चारचाकी वाहनाने चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा बघण्यासाठी गेले मात्र 3 दिवसांपूर्वी त्याठिकाणी वाघाचा हल्ला झाल्याने वनविभागाने मुक्ताई धबधबा पर्यटकांसाठी बंद केला होता.

ते 8 युवक निराश झाले, मात्र त्यांनी नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव बघूया अशी योजना बनविली, आणि सरळ ते नागभीड च्या दिशेने रवाना झाले.

दुपारी 3 ते 3.30 दरम्यान त्यांनी काही वेळ पर्यटनाचा आनंद लुटला त्यानंतर एकाने सेल्फी काढतो म्हणून तलावाच्या काठावर गेला मात्र त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो सरळ तलावात पडला, त्याला वाचविण्यासाठी इतर मित्रांनी पाण्यात उडी घेतली, पाण्याचा प्रवाह आणि खोलाचा अंदाज कुणालाही आला नाही.

 

8 पैकी 26 वर्षीय मनीष श्रीरामे, 27 वर्षीय धीरज झाडे, 25 वर्षीय संकेत मोडक व 17 वर्षीय चेतन मांदाडे हे तलावात पडले मात्र बाहेर कुणी न आल्याने इतर 4 मित्रांनी मदतीसाठी हाक दिली, पोलिसांना माहिती देण्यात आली.
तलावाजवळ पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला, जिल्हा बचाव दलातील कर्मचारी बोट घेऊन आले व त्या चौघांचा शोध सुरू झाला.

 

मात्र पाण्याचा प्रवाह व अंधारामुळे बचाव दलाला शोध मोहिमेत अडथळा आल्याने दुसऱ्या दिवशी सोमवारी शोध मोहीम राबविण्यात आली, सकाळी 10 च्या सुमारास एकाचा मृतदेह मिळाला, त्यानंतर उर्वरित तिघांचे मृतदेह शोध मोहिमेत बचाव दलाला मिळाले.

 

चौघांचे मृतदेह बघून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला, वरोरा तालुक्यातील शेगाव येथे राहणारे ते 4 मित्र होते, 8 मित्र पावसात पार्टी करण्यासाठी निघाले मात्र 4 युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सकाळी राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेत जिल्हा पोलीस अधिक्षक रवींद्र परदेशी सहित तळोधी व नागभीड पोलीस तलावाजवळ दाखल झाले होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणतात…

जिल्ह्यात घडलेल्या 2 घटना हादरविणाऱ्या आहे, पावसाचे दिवस असल्याने अनेक पर्यटक पावसाची मजा लुटण्यासाठी नदी व धबधबा जवळ जातात, मात्र अनोळख्या ठिकाणी जाताना पाण्याची पातळी किती खोल आहे याचा अंदाज कुणाला येत नाही त्यामुळे नागरिकांनी अश्या ठिकाणी जाणे टाळावे, विशेषतः पाण्यात उतरू नका, आपल्याला आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे.
अश्या घटना घडू नये यासाठी जिल्ह्यात असलेल्या पर्यटन स्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी दिव्य मराठी सोबत बोलताना दिली.