NRHM कर्मचाऱ्यांबाबत महत्वाची बातमी

आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन

News34

चंद्रपूर – वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने NRHM मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी 31 मार्च पर्यंत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले होते. मात्र, 3 महिन्याचा कालावधी लोटूनही अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाबाबत महत्वाची माहिती

शासनाने सभागृहात दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली होती. आज मुंबई येथे यासंदर्भात आरोग्यमंत्री यांच्या कक्षेत बैठक बोलावली होती. यावेळी आरोग्यमंत्री यांनी NRHM कर्मचाऱ्यांना लवकरच राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेणार असल्याचे सांगितले.

 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (National Rural Health Mission) ही केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना असून, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात राज्य स्तरापासून ते गावपातळी पर्यंत विविध पदांवर कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहे. एकीकडे नियमित कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांचे कामाचे स्वरूप एकाच प्रकारचे असताना, हे कर्मचारी गेल्या 12 ते 15 वर्षापासून अल्प मानधनावर काम करत आहे, दरम्यान NRHM कर्मचाऱ्यांनी कोव्हिड काळात देखील महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

त्यांच्या संघटनांनी कित्येकदा शासन दरबारी नियमित सेवेत कायम करण्याबाबत आंदोलन, मोर्चे काढले आहेत व वारंवार सरकारकडे सातव्या वेतन आयोगानुसार पगार आणि सेवेत कायम करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या मागणीला घेऊन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरले होते. तेव्हा मंत्र्यांनी 31 मार्च पूर्वी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन महिन्याचा कालावधी लोटूनही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर येत्या काळात निर्णय घेण्यात आला नाही तर या कर्मचाऱ्यासोबत येत्या अधिवेशनात आंदोलन करणार असल्याच्या इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला होता. आज मंत्रि महोदयांनी स्वतः लक्ष देऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.