विजय वड्डेटीवार यांची अर्थसंकल्पावर तिखट प्रतिक्रीया!
मुंबई;
फसव्या घोषणांचं ठिगळं लावलेला खोकेसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला आहे. अडिच वर्ष फक्त घोटाळे, टेंडर, कमिशन, टक्केवारी यातून मालामाल झालेल्या या महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला असून. महिलांसाठी योजना आणून या सरकारने पापाचे प्रायश्चित्त केले आहे. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर तीव्र व तितकीच तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी (ता. २८ जून) शुक्रवारी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे, सदरच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया नोंदवितांना विजय वड्डेटीवार यांनी अर्थसंकल्पाच्या आडून महायुतीच्या आमदारांना खूश करण्यासाठी केलेला हा शेवटचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. गेली अडिच वर्षात शासकीय तिजोरी साफ करून झाल्यावर त्याच तिजोरीवर महायुती सरकारने शेवटचा हाथ फिरवून घेतला आहे. स्वत: घेतलेले खोके जनतेच्या नजरेआड करण्यासाठी काहीतरी केल्याचा केविलवाणा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला गेल्याचा आव आणला जात आहे. असाही आरोप वड्डेटीवार यांनी केला आहे,
महिलांसाठी योजना जाहीर करून महायुती सरकारने प्रायश्चित्त घेतले आहे. महायुतीमधील एका नेत्याने बहिण-भावाच्या नात्यावर घाणेरडे वक्तव्य याच महायुतीच्या नेत्यांकडून केले जाते, त्यामुळे राज्यात महिलावर अन्याय अत्याचाराच्या संख्येत वाढ झालेली आहे, गरीब महिलांना या सरकारने फाटक्या साड्या वाटल्या या सगळयाचे प्रायश्चित्त म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली आहे का? असाही प्रश्न विरोधी पक्षानेत्याने केला आहे. गरीब माता भगिणींना फाटक्या साड्या वाटून पुन्हा त्यावर योजनांची ठिगळं लावून काही उपयोग होणार नाही. राज्यातील महिलांनी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना चांगलाच धडा शिकवलेला आहे, पुढे विधानसभेतही मतदार सत्ताधारी पक्षांना नाकारल्याशिवाय राहणार नाही अशीही टीका विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राज्यातील शेतकरी, महामंडळे, सारथी, बार्टी, महाज्योतीसारख्या संस्था यांच्यासाठी योजना जाहीर केल्या. परंतु हे लबाडाचं आमंत्रण आहे. ते जेवल्यावरच खरं मानावं लागेल. त्यामुळे या फसव्या तरतूदींना भूलन जाऊ नये. कारण अर्थसंकल्प सादर करायचा आणि त्याची अंमलबजावणी करताना जुमलेबाजी करायची हा या सरकारचा शिरस्ता आहे.
कालच आर्थिक पाहणी अहवाल पाहिल्यावर मान शरमेनं खाली जाईल, अशी परिस्थिती दिसून आली आहे. महाराष्ट्राला गुजरातने मागे टाकल्याचा पुरावा म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल होता. दिल्लीश्वरांनी महायुतीला सत्ता मिळवून दिल्यावर त्यांनी महाराष्ट्राला गुजरातच्या मागे ठेवायचं काम महायुतीला दिल होतं. हे काम या सरकारने चोख बजावलं आहे. सुरतमधल्या पाहुणचारावेळी दिलेल्या कानमंत्रानुसार महाराष्ट्राला या महायुतीने खड्डयात घातले आहे. गुजरातच्या खाल्या मिठाला जागणारे हे सरकार महाराष्ट्राचं भलं करू शकत नाही. अशी जळजळीत प्रतिक्रीया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.