एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील कांदोळी येथील मूळचा रहिवासी असलेला मात्र काही वर्षांपासून एटापल्लीच्या बाजारपेठेत राहून छोटे मोठी कामे करून स्वतःचा कसातरी उदरनिर्वाह भागविणारा निराश्रित उत्तम बिमल परमाणिक यांचा अंत्यविधी व श्राद्ध पक्ष स्थानिक रवींद्रनाथ ठाकूर सेवा संस्थाच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून करण्यात आले आहे.
हिंदू धर्म परंपरेनुसार मृत व्यक्तीचा विधिवत अंत्यविधी व श्राद्ध पक्ष केल्याने मृतकाच्या आत्म्यास शांती लाभून स्वर्ग प्राप्ती होतो, असा धर्म संस्कार आहे.
उत्तम परमाणिक हा मुळचा कांदोळी येथील रहिवासी होता, तो जन्मतः वेडसर होता. त्याच्या कुटुंबातील आई, वडील, एक भाऊ व एक बहीण ही सर्वच नातलग वेगवेगळ्या वेळेत व वेगवेगळ्या कारणाने काही वर्षांपूर्वी मरण पावली आहेत. त्यामुळे उत्तम हा निराश्रित झाला होता. तो गेली दहा वर्षांपासून एटापल्लीच्या बाजारपेठेत राहून विविध व्यापाऱ्यांची छोटी मोठी कामे करत होता. मिळालेल्या मोबदल्यात हॉटेलमध्ये भोजन करायचा व एखाद्या बंद असलेल्या दुकानांच्या व्हरांड्यात रात्री आराम करत होता. (१६ एप्रिल) बुधवारी उत्तमची प्रकृती बिघडली, तो तापाने फणफणत होता, ही बाब काही नागरिकांच्या लक्षात आली, नागरिकांनी त्याला पोलिसांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते, प्रकृती गंभीर असल्याने सायंकाळी सहा वाजता उपचारा दरम्यान उत्तम परमाणिक याची प्राणज्योत मावळली, यावेळी निराश्रित उत्तमच्या अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र श्री रवींद्रनाथ टागोर सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेऊन (दि. १७ ) गुरुवारी उत्तमचा अंत्यविधी संस्कार पार पाडण्यात आला. त्यानंतर (दि. २७ एप्रिल) रविवारी सायंकाळी दरम्यान स्वर्गीय उत्तमचे श्राद्ध पक्ष कार्यकारण करण्यात आले आहे.
श्री रवींद्रनाथ टागोर सेवा समितीच्या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात असून समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी दाखविलेल्या मानव धर्म सेवेचे पोलीस तथा स्थानिक प्रशासनाने आभार मानले आहे.