घरोघरी तिरंगा अभियानाच्या ध्वजारोहणास एटापल्ली नगरपंचायतचा खो!

सार्वजनिक बांधकाम व ग्रामीण रुग्णालयानेही फिरविली पाठ,

एटापल्ली;(गडचिरोली)
घरोघरी तिरंगा अधियान अंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या प्रांगणात तीन दिवस ध्वजारोहन कार्यक्रम आयोजन करणे क्रमप्राप्त असतांना एटापल्ली नगरपंचायत प्रशासनाने तिरंगा ध्वजाचे धजारोहन कार्यक्रम घेण्याचे टाळले आहे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात व ग्रामीण रुग्णालयातही ध्वजारोहण करण्याचे औचित्य प्रशासनाने दाखविले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेने जनतेच्या मनात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व कायम राहून देश प्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी, या हेतूने सन २०२२ पासून त्रिदिवशीय स्वातंत्र्य महोत्सव साजरा करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपआपल्या घरावर व प्रत्येक शासकीय कार्यालयावर दिनांक १३ ऑगस्ट, १४ ऑगस्ट व १५ ऑगस्ट असे ध्वजारोहण करण्याचे शासकीय परिपत्रक आहे. त्यामुळे तालुक्यातील तहसील कार्यालयासह विविध शासकीय तथा निमशासकीय कार्यालये, विविध शाळा महाविद्यालय प्रांगणात (ता.१३ ऑगस्ट) मंगळवारी सकाळी ०७ ते ०९ वाजताच्या दरम्यान ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आले आहेत. मात्र ज्या प्रशासनावर तिरंगा अभियानाचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी शासनाने सोपविली आहे. त्याच प्रशासनातील कामचुकार अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे घरोघरी तिरंगा अभियानाला हळताड फासल्या गेल्याचे दिसून येत आहे. सदरच्या प्रकारामुळे स्वातंत्र्य दिन महोत्सवाचे महत्व धूसर केल्या गेले आहे. असे म्हणणे वावगे ठरू नये. यातून देशविरोधी तत्वांना बळ मिळून देशभक्तीला तडा जाण्यास वाव मिळण्यास मदत होण्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासकीय विभागांच्या तिन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण न घेण्याच्या कृतीची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

तीन दिवशीय स्वातंत्र्य महोत्सव साजरा करण्याचे व शासकीय कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण करण्याचे कोणतेही परिपत्रक नसल्याने नगरपंचायत कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला नाही. असे नगरपंचायत मुख्याधिकारी प्रणय तांबे यांनी जनकत्व न्युजशी बोलतांना सांगितले आहे.

सार्वजनिक बांधकाम अभियंता सुनील बावणे यांनीही स्वातंत्र्य दिन महोत्सव संबधी त्रिदिवशीय ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यासंबधी मला काहीही कल्पना नाही. अशी प्रतिक्रिया जनकत्व न्युज सोबत बोलतांना दिली आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ तुपेश उईके यांच्या संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.