आमदार डॉ होळी यांच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांकडून दखल,
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली)
येथे दोन वर्षांपूर्वी उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले शुभम गुप्ता हे आपल्या पदाचा धाक दाखवून कंत्राटदारांना लाखोंच्या लाचेची मागणी करीत होते, अशा अनेक तक्रारी शासन व प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या, प्रशासनाकडून मात्र तक्रारींची दखल घेण्यात आल्या नाहीत, अशातच आमदार डॉ देवराव होळी यांनी दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीची नागपूर आयुक्तांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी संजय दैना यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही विकास पोहोचलेला नाही. मात्र विकास निधीवर डल्ला मारणारे आय ए एस शुभम गुप्ता व त्यांच्या सारखे, लाचखोर अधिकारी पोहचले असून असे अधिकारी जिवंत आदिवशींच्या टाळूवरची लोणी खाण्यास कोणतीही कसर ठेवत नाहीत हे नेहमीच सिद्ध झाले आहे, कंत्राटदार नक्षलावाद्यांच्या दहशतीत रस्ते, आरोग्यसह पायाभूत सुविधेची कामे करावी लागतात. मात्र, एटापल्लीचे तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी शुभम गुप्ता कंत्राटदारांना आपल्या पदाचा धाक दाखवून खुलेआम लाखोंच्या लाचेची मागणी करीत होते.
यासंदर्भात कंत्राटदारांनी गडचिरोलीचे आमदार डॉ. होळी यांच्याकडे धाव घेत आपली व्यथा मांडली. त्याअनुषंगाने आमदार डॉ. होळी यांनी १३ सप्टेंबर २०२२ रोजी शुभम गुप्ता यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर तब्बल दोन वर्षांनी शासन, प्रशासनाला जाग आली, मे महिन्यात महसूल विभागाकडे सदर तक्रार वर्ग करण्यात आली, त्यावरून नागपूर विभागाचे महसूल उपायुक्त यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र पाठवून या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सादर लाचखोर गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दोन वर्षाचा कालावधी लागला असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान एटापल्ली येथून गुप्ता यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली होती. सध्या ते सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे तक्रारीच्या दोन वर्षानंतर जिल्हाधिकारी काय चौकशी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना शुभम गुप्ता यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यांच्याकडे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भामरागडचा प्रकल्प अधिकारी, नगरपंचायत एटापल्लीचा मुख्यकार्यकारी अधिकारी, अशी मालाईदार प्रभार गुप्ता हे आपल्याकडे स्वतःहून ठेऊन घेत होते, त्यावेळी कंत्राटदारांना लाच मागितल्याच्या तक्रारीसोबत आदिवासिंसाठी असलेल्या गाय वाटपसह इतर योजनामध्ये लाखोंचा घोटाळा करण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. यासर्व प्रकरणाची चौकशी थंड बस्त्यात ठेवण्यात आली आहे. सोबतच लाखो रुपये खर्च करून तांत्रिक दृष्ट्या अयोग्य अशा दुचाकी रुग्णवाहीका खरेदी करण्यात आल्या. त्याही धुळखात पडून आहेत.
गुप्ता हे धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी म्हणूनही वादग्रस्त कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्या विरुद्ध जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी अविश्वास ठराव पारित करून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, हे विशेष.
आता जिल्हाधिकारी संजय दैना यांच्याकडून लाचखोर व वादग्रस्त शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्ट नीतीच्या कारभाराची सखोल चौकशी करतात की कसे? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.