चंद्रपूर जिल्ह्यात “पूर रिटर्न”

ग्रामीण भागातील अनेक मार्ग बंद

News34

 

चंद्रपूर – वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर शहरात देखील पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर, सिस्टर कॉलनी, तिमांडे ले-आउट मधल्या हजारो घरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय.

चंद्रपूर शहर हे इरई आणि झरपट नद्यांच्या किनाऱ्यावर आहे आणि या नद्यांचं पाणी हे वर्धा नदीला जाऊन मिळतं. मात्र वर्धा नदीचं पात्र फुगल्याने इरई आणि झरपट नद्यांचं पाणी वर्धा नदीत जात नसल्याने ते चंद्रपूर शहरात शिरायला सुरुवात झाली आहे. पुराचं हे पाणी वाढण्याच्या भीतीने अनेक लोकांनी आपलं सामान स्थानांतरित करण्यास सुरुवात केली आहे.

चंद्रपुरात संभाजी भिडे यांच्या सभेत गोंधळ

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यातील लहान मोठे लघु व मध्यम सिंचन प्रकल्प ओवरफ्लो झाल्याने तुडुंब भरून वाहत आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्याजवळून वाहत असलेल्या वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

आज सकाळी बल्लारपूर-राजुरा मार्ग बंद झाला आहे, बल्लारपूर जवळील वर्धा नदीच्या पुलावर पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
हा मार्ग बंद झाल्याने राजुरा, गोंडपीपरी, जिवती, कोरपना तालुक्याचा सम्पर्क तुटला आहे.
गोंडपीपरी तालुक्यातील विरुर स्टेशन लाठी मार्गावरील पुलावर पाणी आल्याने 9 गावांचा सम्पर्क तुटला आहे.

 

कोरपना तालुक्यातील भोयेगाव चंद्रपूर हा मार्ग 21 जुलै पासून बंद झाला आहे, कोरपना तालुक्यातील काही भागात शेती पाण्याखाली आली आहे.
पाऊस थांबला मात्र पाण्याचा हाहाकार सध्या सुरू आहे, यामुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.